बारामती प्रतिनिधी
सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यांनी एकत्रित येऊन विषमुक्त सेंद्रिय शेती उत्पादने घेऊन त्यामध्ये सातत्य ठेवले तर सेंद्रिय उत्पादक शेतक-यांच्या आयुष्यात स्थिरता येईल असे मत माजी केंद्रीय कृषिमंञी शरद पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान राज्याचे कृषिमंत्री पणनमंत्री व सहकार मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पुढील महिन्यांमध्ये मोर्फा या सेंद्रिय शेती उत्पादक संस्थेच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पवार यांनी पदाधिका-यांना दिले.नुकतीच गोविंदबाग या पवार यांच्या निवासस्थानी या संदर्भातील एक महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीस सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी प्रतिनिधी शिवरूपराजे खर्डेकर, प्रगतशील शेतकरी व मोर्फा चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, तुषार कारले, सुनील ढवळे, अतुल कारले, समीर दुगणे, निलेश पांडे, राजेंद्र वरे, अमरजित जगताप, डॉ. गोवर्धन भुतेकर, डॉ.संदिप वाघ, डॉ. दीपक बहीर, गणेश पारेकर, विजय शितोळे व रोहित अहिवळे आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले की, सेंद्रिय शेतीपुढे सध्या अनेक समस्या आहेत. पण संघटीतपणे सेंद्रिय शेती उत्पादनाचा एकच ब्रँड बनविल्यास “शेतकरी ते ग्राहक” साखळी मजबूत होऊन दोघांचाही फायदा होईल. अनेक निर्यातदार व स्थानिक सुपर मार्केटचे प्रतिनिधी सर्व सेंद्रिय उत्पादने घेण्यास उत्सुक आहेत. पण गुणवत्तापूर्ण विषमुक्त मालाची हमी व सातत्याने पुरवठा ही त्यांची अट आहे. याबाबत शेतक-यांनी अभ्यासपूर्ण काम करुन मार्केटची सेंद्रिय उत्पादनाची गरज पूर्ण करावी.
सेंद्रिय शेती उत्पादन व मार्केटिंग संबंधित अडचणी-
१) राज्यभरात विखुरलेले असंघटित सेंद्रिय शेती करणारे उत्पादक व शेतकरी कंपन्या मध्ये परस्पर समन्वयाचा अभाव आहे.
२) प्रमाणिकरण करण्यासाठी शासनाची सक्षम यंत्रणा व कार्यपद्धती नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांनी सेंद्रिय प्रमाणिकरणासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभी केली आहे.महाराष्ट्र राज्यानेही तशी सक्षम यंत्रणा उभारावी.
३) शेतमाल वाहतुक व दळणवळणाच्या मर्यादित सुविधा आहेत, त्या शासनाने वाढवाव्यात.
४) व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव तसेच जाहिरातीतील पिछाडी.
५) शेती उत्पादनात वैविध्य परंतु मागणीनुरुप पुरवठ्यास मर्यादा.
६) सातत्याने पुरवठा करण्याची शाश्वती नसल्यामुळे निर्यातदार जोडले जात नाहीत, त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावेत.
७) सेंद्रिय माल साठवणूक तंत्र शासनाने ऊपलब्ध करून दिल्यास शेकक-यांचे होणारे नुकसान टळेल.व शीत साखळीच्या मर्यादा आहेत. शासकीय स्तरावर त्या वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
८) शेतक-यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत नसल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादनाला मर्यादा येत आहेत.
******************************************
महाराष्ट्र राज्याची सेंद्रिय शेती दृष्टीक्षेपात.....
१) राज्यातील ६५ हजार शेतकरी ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर थर्ड पार्टी सर्टिफिकेशन करुन सेंद्रिय शेती करतात.
२) कृषी विभागाच्या आत्मामधून ४० हजार शेतकरी २०हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करतात.
३) राज्यातील एक लाखपेक्षा जास्त हेक्टरवर रेसिड्युफ्री (विषमुक्त) शेती शेतकरी करतात.