बारामती प्रतिनिधी
बारामतीत मागील काही महिन्यांपासून शहराचे झपाट्याने शहरीकरण वाढत आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे बारामतीकरांना कोणतीही अडचण येणार नाही. याचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन बद्दल बारामतीचा विकास केला आहे व अद्याप सुरूच आहे.
शहराच्या वैभवात भर घालणारे अनेक पथदर्शी प्रकल्प बारामतीत उभारण्यात आले आहेत. मात्र स्थानिक शासन प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिकांना सोयीचे ठरण्याऐवजी अडचणीचे ठरत असल्याचे येथील गणेश भाजी मंडई मार्केटमधील बकालपणामुळे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून बारामती नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून प्रशस्त पार्किंग सह येथील भाजी मार्केट उभारले आहे. या भाजी मार्केटमध्ये २५६ विक्रेत्यांना ओट्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र या भाजी मार्केटमधील पार्किंग सुविधा अद्याप बंद अवस्थेत आहे. स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. विशेषता येथील ओटाधारक विक्रेते मंडईतील ओ ठ्यांचा वापर न करता ते मंडईच्या परिसरात इतरत्र बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. व त्यांचा वापर स्टोअर रूम सारखा केला जात आहे. त्यामुळे मंडईत मोठ्या प्रमाणात दाटी व गर्दी होत आहे. भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. अशा विक्रेत्यांच्या गाड्या रहदारीच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त लावल्या जातात. अनेक विक्रेत्यांकडून नागरिकांना असभ्य भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
भाजी मंडईत असणाऱ्या २५६ ओटाधारकापैकी ५० टक्के ही ओटाधारक त्याचा वापर करत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे मंडईत दाटी व गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांना फळे व भाजीपाल्यांची खरेेदी करता येत नाही. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नगरपालिका प्रशासनाद्वारे नेमून दिलेल्या ओटा धारकांनी त्यांचा माल विकण्यासाठी ओटाचा वापर करण्याच्या सूचना कराव्यात व रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या व ग्राहकांना असभ्य भाषा वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
..................
बारामती तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची जागा वापरताहेत व्यापारी....
भाजी मार्केट मध्ये नेहमी येणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १०२२.८४ चौरस मीटर जागा राखून ठेवण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या या जागेवर येथील व्यापाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताबा मिळवला आहे.
..................
जेथे मंडई भरायला हवी ती जागा रिकामी असते. नागरिकांना ये- जा कराव्या लागणाऱ्या रस्त्यावरच विक्रेते बसत आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालणे अडचणीचे ठरत आहे. नगरपालिकेने येथे होणाऱ्या गर्दीची समस्या सोडवणे गरजेचे आहे.
महेंद्र जाधव- ( नागरिक,बारामती)
..................
गणेश मार्केटमधील ज्या काही समस्या आहेत त्याची पाहणी करून लवकरच त्या समस्या सोडविल्या जातील.
किरणराज यादव- ( मुख्याधिकारी,बारामती नगरपालिका)



