सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वट पौर्णिमा हा दिवस महिलांसाठी विशेष मानला जातो या दिवशी विवाहित महिलावर्ग त्यांच्या दृष्टीने दरवर्षीच ते नटणं..घोळक्यांत एकमेकींच्या सोबतीने वडाच्या पूजनाला जाणं… सकाळपासूनची ती सणाची लगबग…घरात गोडाचा सुगंध.. त्यात वटपौर्णिमेचा महिलांचा साज आणि ती नऊवारी साडी अन ‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणत ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या हौसेने वटपौर्णिमा साजरी केली.आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करण्यात आली.
एकमेकींना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असून एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही ही संकल्पना सर्वांच्या मनी आहे. म्हणून वडपिंपळ झाडाची पूजा करत इतरही दिवशी करत त्याचे जतन केले जाते.