Type Here to Get Search Results !

कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी मेंदू अधिक प्रभावी- डॉ.पंडित विद्यासागर

कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी मेंदू अधिक प्रभावी- डॉ.पंडित विद्यासागर
सोमेश्वरनगर - सध्याच्या काळामध्ये सर्वांच्या तोंडी कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला असला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेवर मात करण्याची ताकद नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मानवी मेंदूतच असल्याचा ठाम विश्वास ख्यातनाम संशोधक , विज्ञान साहित्यिक आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केला. सोमेश्वरनगर (ता.बारामती ) येथील मु .सा. काकडे महाविद्यालयाच्या मुगुट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक आर.एन.(बापू) शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालयाचे सचिव श्री. सतीश लकडे ,व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा.विलास बोबडे, प्रा.भीमराव बनसोडे, प्रा.धोंडीराम आगवणे, मुगुट महोत्सव प्रमुख डॉ.गेनू दरेकर आदी सर्व मान्यवर उपस्थित होते. ‌‌  

डॉ.पंडित विद्यासागर पुढे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या पाठीमागे लागून तरुणांनी आपले भविष्य खराब करून घेऊ नये मात्र या तंत्रज्ञानापासून स्वतःला दूरही ठेवू नये. तसेच महाविद्यालयामध्ये होणारे विविध उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घ्यावा असा आशावाद डॉ. विद्यासागर यांनी व्यक्त केला. व्यक्तिमत्व विकासासाठी आणखी एका गोष्टीच्या पाठीमागे विद्यार्थ्यांनी धावले पाहिजे ते म्हणजे वाचन, आणि वाचनातून विद्यार्थ्यांना स्वतःचा शोध लागण्याची शक्यता सर्वाधिक असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत वाचन करत राहिले पाहिजे. जगाच्या पाठीवर यशस्वी झालेल्या माणसांमध्ये केवळ वाचनातूनच आमुलाग्र बदल झाला असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. ‌ ‌कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे देशमुख यांनी महाविद्यालयातील गुणी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे कौतुक केले. प्रास्ताविक मुगुट महोत्सवाचे प्रमुख डॉ.गेनू दरेकर यांनी केले. यावेळी त्यांनी मुगुट महोत्सवातील कार्यक्रमांचा आढावा घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी महाविद्यालयातील वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी 'मुगुट' या वार्षिकांकाचे प्रकाशन व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संजू जाधव यांच्या "पॅराडीम्सऑफ एक्झिस्टन्ससियालिझम इन द सिलेक्टेड नाॅव्हेल्स ऑफ अनिता देसाई" या व बीबीसीए चे प्रमुख प्रा. रजनीकांत गायकवाड व प्रा. प्रियंका होळकर या लेखकांनी लिहिलेल्या 'डिजिटल बँकिंग' या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचे व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
         
या मुगुट महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते झाल्यानंतर शितल पाटील व संभाजी ससाणे यांची मुख्य भूमिका असणारा व शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित 'रुबाब" या चित्रपटाचे प्रमोशन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले व त्यानंतर'काव्य मैफिल' याचे आयोजन करण्यात आले होते. कवी हनुमंत चांदगुडे, सुमित गुणवंत, कवी चंद्रकांत चाबुकस्वार, कवी अनिल कदम, कवी सोमनाथ सुतार, कवी संतोष शेंडकर उपस्थित होते. त्यांनी शेतकरी, आई, वडील, राजकीय या विषयावर भाष्य करणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले. तसेच प्रेमकवितांबरोबरच शेणा मातीतल्या कवितांना ही विद्यार्थ्यांनी दाद दिली. ग्रामीण भागातील युवकांचे, शेतीचे, जागतिकीकरणाने आलेल्या अस्वस्थतेचे प्रश्न कवीनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडले.  
        
 या महोत्सवामध्ये शाहिरीपोवाडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकप्रिय लोकशाहीर श्री. राजेंद्र कांबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात श्री छत्रपती संभाजी महाराज तसेच ,'गर्जा महाराष्ट्र माझा' यासारखे अनेक पोवाडे सादर करून सर्वांच्या अंगावरती शहारे उभे केले. ‌‌या मुगुट महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, बुद्धिबळ, कब्बड्डी, खो खो यासारख्या विविध क्रीडा स्पर्धांसोबत पुष्परचनास्पर्धा, रांगोळीस्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, काव्य स्पर्धा विविध स्पर्धांच्या आयोजनाबरोबरच साडी डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे, स्पोर्ट्स डे, मिस मॅच डे आदी डेज आणि आनंद मेळा, शेला पागोटे आणि फूड अँड फन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बुद्धिबळ आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन याचा आनंद घेतला. 
        
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 'फॅन्सी ड्रेस' चे आयोजन केले होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक, ऑपरेशन सिंदूर तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर करून सर्वांची वाह, वाह! मिळवली.
      मुगुट महोत्सवाचा शेवट हा विविध गुणदर्शनाने झाला. याचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन खेडकर यांच्या शुभहस्तेआणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्रा.डॉ.धोंडीराम पवार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिनेत्री सिमरन खेडकर म्हणाल्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करावी त्यासाठी पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. आपल्या क्षमतांचा शोध घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी वेळेत केला तर आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष वाया जाण्याचा धोका टाळता येतो अन्यथा असा काही काळ वाया गेल्याने येणारी नकारात्मकता ही घातक ठरू शकते असे विचार यावेळी त्यांनी मांडले व शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे व प्रा. डॉ.धोंडीराम पवार यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली यामध्ये चंद्रा, अप्सरा या लावण्यांना प्रतिसाद मिळाला. हिंदी, मराठी नव्या , जुन्या गाण्यांनी कार्यक्रमाला रंगत आली . तसेच कृष्णलीला, माऊली, कोळी नृत्य व शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कैदेच्या प्रसंगाने उपस्थित्यांच्या डोळ्यात पाणी आले.
      
संपूर्ण मुगुट महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . अच्युत शिंदे यांनी केले. या संपूर्ण मुगुट महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. सतीश काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे , व्यवस्थापन समितीचे सर्व मान्यवर सदस्य या सर्वांचेच विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच मुगुट महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुगुट महोत्सव प्रमुख डॉ .गेनू दरेकर व विविध समिती समन्वयक आणि सदस्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच सहकार्य लाभल्याने हा चार दिवसाचा 'मुगुट महोत्सव २०२६' यशस्वीरित्या संपन्न झाला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test