Type Here to Get Search Results !

कोणत्याही प्रकारचे सांड‌पाणी अथवा केमिकलयुक्त पाणी निरा नदीमध्ये सोडले जात नाही - पुरुषोत्तम जगताप

कोणत्याही प्रकारचे सांड‌पाणी अथवा केमिकलयुक्त पाणी निरा नदीमध्ये सोडले जात नाही - पुरुषोत्तम जगताप 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याकडून कोणत्याही प्रकारचे सांड‌पाणी अथवा केमिकलयुक्त पाणी निरा नदीमध्ये सोडले जात नसल्याचे कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून ठामपणे स्पष्ट करण्यात आले आहे. 
काही व्यक्तींनी कोणताही ठोस पुरावा नसताना कारखान्याविरुद्ध चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवून कारखान्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी केला आहे. असे आरोप पूर्णतः निराधार असून त्यामागे वैयक्तिक स्वार्थ व गैरसमज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कारखान्यामध्ये अत्याधुनिक व पर्यावरणपूरक ईटीपी (Effluent Treatment Plant) प्रकल्प कार्यरत असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाते. या प्रकल्पामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अशा तिन्ही स्तरांवर सांडपाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी पूर्णतः सुरक्षित व पुनर्वापरासाठी योग्य ठरते. हे पाणी इरिगेशनसाठी तसेच कारखाना परिसरातील हरित क्षेत्रासाठी वापरण्यात येत असून "झिरो डिस्चार्ज" संकल्पनेनुसार कारखाना कार्यरत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

कारखान्याने केवळ उत्पादन क्षेत्रातच नव्हे, तर पर्यावरणीय जबाबदारीच्या बाबतीतही आदर्श निर्माण केला आहे. राज्यात उच्चांकी गाळप व उच्चांकी साखर रिकव्हरी साध्य करत, सभासद शेतकऱ्यांना नेहमीच स्पर्धात्मक व समाधानकारक दर देण्याची परंपरा कारखान्याने जपली आहे.

दरम्यान, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने कारखान्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तब्बल ३५ एकर क्षेत्रात 'नक्षत्र वनउद्यान' विकसित केले आहे. या भव्य उपक्रमाअंतर्गत सुमारे ५५०० देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्यामध्ये २.५ एकर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील जैवविविधता वाढण्यास मोठी मदत होत आहे.

या उद्यानाच्या पाणीपुरवठ्यासाठी कारखान्याकडून सुमारे ३ किलोमीटर लांबीची स्वतंत्र पाइपलाईन उभारण्यात आली असून, ईटीपीमधून प्रक्रिया केलेले पाणी थेट उद्यानात पोहोचवले जाते. मागील पाच महिन्यांपासून या उद्यानाला नियमित व शाश्वत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. या उपक्रमामुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन पर्यावरण संवर्धनास मोठा हातभार लागत आहे.

एकूणच, उत्पादन, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत संतुलित प्रगती साधणारा श्री सोमेश्वर सह साखर कारखाना हा परिसरासाठी एक आदर्श प्रकल्प ठरत असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test