सुपे प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे व परिसरामध्ये शनिवार दि.१०रोजी रात्रभर जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकरी वर्ग धास्तावला असून नुकसानीमुळे शेती व्यवसायावर वरवंटा फिरला आहे .सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सुपे भागामध्ये ९५ मिलिमीटर पावसाची पावसाची नोंद झाल्याची माहिती गावकामगार तलाठी दीपक साठे यांनी दिली. सुपे व परिसरातील भोंडवेवाडी, बोरकरवाडी कुतवळवाडी ,खंडूखैरेवाडी ,चांदगुडेवाडी, राजबाग काळखैरेवाडी ,पानसरेवाडी ,दंडवाडी, वढाणे , काऱ्हाटी आदी गावांमध्ये हा परतीचा पाऊस झाल्याने ओढे तुडुंब वाहत आहेत व तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे .जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने ऊसाची पिके आडवी झाली असून सततच्या पावसाने लावलेला कांदा पिवळा पडून त्याच्या माना लांब झाल्या आहेत .कांदा रोपे पिवळी पडून गेली आहेत तसेच डाळिंब सीताफळ बागांनाही त्याचा फटका बसला आहे. सूर्यफूल,कडवळ,मका पिके आडवी झाली आहेत.सततच्या पावसामुळे पिकांना तेजी नसून रोग पडण्याचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे त्यामुळे उत्पन्न कमी आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी वैतागला आहे. मेथी,कोथिंबीर,गवार, टोमॅटो ,मिरची या पिकांचेही नुकसान झाले आहे. संततधार पावसाने नुकसान झाल्याची माहिती नारोळी गावचे शेतकरी व माजी सरपंच दशरथ ढमे,कुतवळवाडी येथील माजी उपसरपंच बाळासाहेब कुतवळ,बोरकरवाडी येथील मधुकर बोरकर,संजय बोरकर, काऱ्हाटी येथील बाळासाहेब वाबळे वसंतराव जाधव यांनी दिली. दरम्यान शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सुपे मोरगाव रस्त्यावरील काळा ओढा आज रविवारी दिवसभर तुडुंब होऊन वहात होता .या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची त्रेधातिरपीट उडत होती तर अनेक दुचाकीस्वार खड्ड्यामध्ये घसरून पाण्यात पडत होते. या रस्त्याचे काम चालू असून या ओढ्यावरील पूल उभारण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. **************************



