इंदापूर प्रतिनिधी
मदनवाडी (ता. इंदापूर) येथील सुतार कुटुंबीयांची घरे व शेती अतिवृष्टीमुळे तलावाचा सांडवा फुटून आलेल्या पुरात वाहून गेली. या घटनेला महिना उलटत आला तरी अजून कोणत्याही प्रकारची मदत सुतार कुटुंबियांना मिळालेली नाही. घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करूनही हे कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतिक्षेतच आहे. या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दत्तात्रय भरणे, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या भागाची पाहणी केली. परंतु अद्यापपर्यंत सुतार कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसून त्यांनी सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा आसरा घेतलेला आहे. अनेक राजकीय पुढारी व नेते यांनी सुतार कुटुंबियांना भेटून मदतीचे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात अद्यापही हे कुटुंब मदतीपासून वंचित राहिले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच अडचणीत व बेरोजगारीने हतबल झालेल्या सुतार कुटुंबियांना अंगावरील कपड्यानिशी घर सोडून जावे लागल्याने या कुटुंबापुढे खाण्यापिण्यासहीत मोठा प्रश्न उभा राहिला आहे. लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा नवनाथ सुतार यांनी व्यक्त केली.



